लखनौ -
लखनौ -
मुलायमसिंह यांच्या जाहीर घोषणेनंतर कल्याणसिंह यांनी त्यांना त्याच भाषेत उत्तर दिले आहे. ""आपण समाजवादी पक्षात येण्याचे मुलायमसिंह यांचे निमंत्रण कधीच स्वीकारलेले नाही. भविष्यातही तसे करणार नाही,'' असे त्यांनी येथे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. त्याचबरोबर भाजपशिवाय दुसरा कोणताच पक्ष अयोध्येत राममंदिर उभारणार नाही, असे सांगत भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला गोंजारण्याचा प्रयत्न त्यांनी केला. अयोध्येत राममंदिर उभारण्यासाठी कटिबद्ध असून, आपल्याला तेथे मंदिर झालेले पाहायला आवडेल, असे सांगायलाही ते विसरले नाहीत.
आपण आजही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य असून, हिंदुत्वाच्या माध्यमातूनच देशाचा विकास होऊ शकतो. हिंदू शक्तींना बलवान बनविण्याची गरज आहे; तसेच त्यासाठी आपण सदैव तयार असल्याचे कल्याणसिंह म्हणाले. सरसंघचालक मोहन भागवत यांच्याशी चर्चा केली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मुलायमसिंह यांच्या जाळ्यात आपण अडकलो होतो, अशी कबुली देत समाजवादी पक्षाबरोबरच्या अकरा महिन्यांच्या घरोब्यादरम्यान तेथे कोणतीही संधी दिसली नसल्याचे त्यांनी सांगितले. मला पक्षात घ्या, असे कधीही म्हटले नव्हते. मुलायमसिंह आणि अमरसिंह यांनीच आपल्या दारात येऊन पक्षात येण्याचे निमंत्रण दिले होते; मात्र आपण नकार दिल्यानंतर त्यांनी राजवीरसिंहला पक्षात येऊ द्यावे, असे विनंती केली होती. समाजवादी पक्षाला लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या जागांपैकी आठ जागा आपल्या व्यक्तिगत प्रभावामुळे मिळाल्याचा दावाही त्यांनी केला.
Monday, November 16, 2009
यवतमाळ जिल्ह्यातील पहिले मराठी न्यूज पोर्टल



